manovikas prakashan
Aanibaniche Nayak Aani Khalnayak आणीबाणीची नायक आणि खलनायक By Shrimant Mane श्रीमंत माने
Aanibaniche Nayak Aani Khalnayak आणीबाणीची नायक आणि खलनायक By Shrimant Mane श्रीमंत माने
Couldn't load pickup availability
इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण या आणीबाणीतील दोन प्रमुख नेत्यांचे
चरित्र, चारित्र्य, स्वभाव, जवळीक, दुरावा आणि महत्त्वाकांक्षांचे द्वंद्व या
साऱ्यांची ही विस्तृत कहाणी आहे. सत्ता आणि महात्म्य यातील चढाओढीची ही
अभूतपूर्व गाथा आहे. व्यक्तिगत संबंधातला संशयास्पद गोडवा आणि राजकारणातील
टोकाचा दुरावा यांची ही गोष्ट आहे.
आणीबाणीचे समर्थन कुणी करणार नाही. मात्र ती लावली जाण्यामागची कारणे
महत्त्वाची आहेत. राजकीय भ्रष्टाचार आणि बांगला विजयामुळे इंदिरा गांधींना
मिळालेली राष्ट्रीय व जागतिक मान्यता आणि त्यावर उफाळलेला त्यांच्या
स्वपक्षीय नेत्यांचा रोष या गोष्टी येथे लक्षात घ्याव्या अशा आहेत. महागाई व
बेरोजगारीचे संकट, बँकांच्या राष्ट्रीयीकरणाने संतापलेले देशभरचे भांडवलदार
आणि म्हातारपणाकडे झुकलेल्या काँग्रेसमधील पुढाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा या
गोष्टीही यात महत्त्वाच्या ठराव्यात. 'आणीबाणी हा नाइलाज आहे' हे स्वतः
इंदिरा गांधींनीच म्हटले आणि 'सरकारविरोधी आंदोलन करण्यात आपली चूक
झाली' ही जयप्रकाशांनी विनोबांजवळ दिलेली कबुली साऱ्या घटनांवर वेगळा
प्रकाश टाकणारी आहे. त्याच वेळी संघाचे सरसंघचालक देवरस यांनी इंदिरा
गांधींना दोन पत्रे लिहून मागितलेली माफी; एकनाथ रानडे, दत्तोपंत ठेंगडी
आणि भाऊराव देवरस यांनी संजय गांधींजवळ लिहून दिलेले 'शरणपत्र'
(डॉक्युमेंट ऑफ सरेंडर) हेही यातच पाहावे असे आहे. मी स्वतः आणीबाणीत
१४ महिने तुरुंगात होतो आणि बाजपेयींसारखा विरोधी नेता दीर्घ काळपर्यंत
पॅरोलवर कसा राहिला, ही गोष्ट तेव्हाही आम्हा राजबंद्यांना कळली होती!
या साऱ्या प्रश्नांमागे असलेली या दोन नेत्यांच्या मानसिकतेची आरंभापासूनची
घडण, त्यांनी अनुभवलेल्या राजकीय आपदा व त्यासोबतच मिळवलेली अमाप
लोकप्रियताही श्रीमंत माने यांनी प्रदीर्घ स्वरूपात लिहिली आहे. विसाव्या शतकाचा
संक्षिप्त राजकीय इतिहास ठरावा, असे हे लिखाण आहे. त्यातल्या प्रत्येक विधानाची
प्रमाणे त्यासोबत आहेत. त्यामुळे ती विश्वसनीय ठरणारीही आहेत.
तात्पर्य, आणीबाणीबाबत प्रकाशित व अप्रकाशित, जाहिरात केलेल्या व दडवलेल्या
सगळ्या घटनांचा यातील तपशील वाचकांना अभ्यासनीय वाटावा व या घटनाक्रमांकडे
पाहण्याची वेगळी दृष्टी देणारा आहे. महाराष्ट्र या दोन दर्शनांचे सत्याग्रहासारखेच
स्वागत करील याविषयीचा माझा विश्वास वाचक खरा ठरवतील ही अपेक्षा आणि
श्रीमंत माने यांच्या अभ्यासू वृत्तीचे अभिनंदन!
प्रा. सुरेश द्वादशीवार
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.