Skip to product information
1 of 1

utkarsh prakshan

Tuka Mhaneतुका म्हणे By Sadanand More सदानंद मोरे

Tuka Mhaneतुका म्हणे By Sadanand More सदानंद मोरे

Regular price Rs. 160.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 160.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनास ३५० वर्ष पूर्ण होत असण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात अनेकांनी आपापली सेवा तुकारामचरणी रूजू केली. दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’ मधून ‘तुका म्हणे’ हे सदर जवळजवळ वर्षभर चालवून मीही माझा वाटा उचलला. प्रस्तुत कृती या सदराला दिलेले पुस्तकरूप आहे. त्याचे श्रेय महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्री. कुमार केतकर आणि उत्कर्ष प्रकाशनचे श्री. सुधाकर जोशी यांना आहे. त्यांचे व या सदरावर प्रेम करणाऱ्या वाचकांचे मनापासून आभार.
सदर सुरू करण्यापूर्वी काही वर्षे अगोदर माझा ‘तुकाराम दर्शन’ हा ग्रंथ असाच म्हणजे ‘साप्ताहिक सकाळ’ मधील सदरातून सिद्ध झाला होता. त्यात श्रीतुकोबा हे मराठी संस्कृतीच्या केंद्रस्थानी असलेले संस्कृतीपुरुष असल्याचे प्रतिपादन केले होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ मधील अभंगांची निवड केवळ आध्यात्मिक वा पारमार्थिक दृष्टिकोणातून केलेली नसून तुकोबांच्या विचारांचे व व्यक्तित्वाचे अनेक पैलू दिसावेत अशा तऱ्हेने केलेली आहे. या पैलूंचाच प्रभाव मराठी संस्कृतीवर आहे.
प्रयत्न, प्रतिभा आणि प्रसाद अशी तीन काव्यकारणे असल्याचे प्रतिपादन प्राचीन काव्यमीमांसकांनी केलेले आहे. मात्र प्रासादिक कवींची उदाहरणे फारशी आढळत नाहीत. तुकोबा आपली कविता प्रसादातून निर्माण झाली असल्याचे नि:संदिग्धपणे सांगतात. हा प्रसाद देवाचा व संतांचा असा दुहेरी आहे.
‘‘पांडुरंगे केले स्वप्नामाजी जागे।
सरवे पांडुरंगे येवोनिया।।
सांगितले काम करावे कवित्व।
वाउगे निमित्त बोलो नये।।”
तसेच
“नामदेवा पायी तुक्या स्वप्नी भेटी।
प्रसाद हा पोटी राहिलासे।।”
तुकोबांची वाणी ही अशाप्रकारे प्रासादिक आहे. म्हणजे त्यांना कवित्वशक्ती ईश्वराने दिलेली आहे.
‘‘माझ्या मुखे मज बोलवितो देव।
अर्थ गुह्य भाव तोचि जाणो।।”
आपण या ईश्वराचे प्रेषित आहोत, निरोपे आहोत आपले म्हणजे अधिकृत ईश्वरी संदेश आहे.
“आता येथे कैसा तुका।
बोले सिका स्वामीचा।।”
तुकोबांच्या या दाव्यामुळे त्यांच्यावर सनातनी पंडितांचा रोष होणे साहजिक होते. तुकोबांच्या वचनांना समकालिन गुणग्राहक ‘तुकाराम वेद’ म्हणू लागले होते त्यामुळे व ‘‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा” अशा तुकोबांच्या आव्हानात्मक अभिव्यक्तीमुळे असे व्हायचेच होते. पण त्यातून तुकोबांचे कवित्व तावून, सुलाखून, झळाळून बाहेर पडले. त्याची लोकप्रियताच एवढी होती की सोलोमालो सारख्याला त्याची नक्कल करण्याचा मोह आवरला नाही. ‘अभंगवाणी प्रसिद्ध तुकायाची’ असे समीकरण रूढ झाले. “तुकारामाचे अभंग लाघवी रामा मजेवरी गात जा” असे सगनभाऊ आपला साथीदार रामा गोंधळी याला सांगतो तर दुसरीकडे मोरोपंतांसारखा संस्कृतनिष्ठ कवीसुद्धा तुकोबांच्या अभंगाशिवाय कीर्तनच शक्य नाही अशी भूमिका घेतो.
तुकोबांचे हे आकर्षण इंग्रजी काळातही टिकून राहिले. प्रार्थना समाजाच्या रानडे भांडारकरांसारख्या धुरीणांनी आपल्या नवभागवत संप्रदायाची उभारणी तुकोबांच्या अभंगांच्या आधारे करून तुकोबा जगद्गुरु असल्याचे घोषित केले.
स्वातंत्र्योत्तर काळात तर दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्यासारख्या वैश्विक जाणीवेच्या कवीने तुकोबांचे कवी म्हणून जागतिक पातळीवर स्थान किती वरचे आहे याचे दर्शन घडवले.
वारकरी परंपरेचे कळस झालेल्या मराठीपणाचा आदर्श असलेल्या आणि तरीही साऱ्या सीमा ओलांडून वैश्विक आवाहनक्षमता असलेल्या तुकोबांच्या अभंगांचे हे एक ओझरते दर्शन.
- सदानंद मोरे
View full details